एनपीएस वात्सल्य योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात नागपूर जिल्ह्याचा राहणार सहभाग
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात 18 सप्टेंबर बुधवार रोजी होत आहे. नवी दिल्ली येथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नागपूर जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग आहे. देशातील मोजक्या जिल्ह्यामध्ये नागपूरचा सहभाग निश्चित झाला असून हा कार्यक्रम नागपूर येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स, बेलतरोडी येथे दुपारी 1:30 वाजता होणार आहे.
नागपूर जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मोहित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळा, बेलतरोडी येथे 40 विद्यार्थी आणि 40 पालकांच्या सहभागात जिल्हा या राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व अन्य मान्यवर या कार्यक्रमाला दिल्ली येथून संबोधित करणार आहेत. 18 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 ते 4.00 या कालावधीमध्ये हा कार्यक्रम होणार असून नागपूर येथील बँक ऑफ इंडिया या अग्रणी बँकेमार्फत याचे आयोजन करण्यात आले आहे.
एनपीएस वात्सल्य योजनेविषयी :
एनपीएस वात्सल्य ही 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे. पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान 1 हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादीत रुपये जमा करू शकतो. मुलाच्या 18 वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खाते होणार आहे. मुलगा 18 वर्षाचा झाला की, हे खाते अखंडपणे नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रुपांतरीत केले जाऊ शकते. थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते शून्य ते 18 या वयोगटात उघडण्याची ही योजना आहे. मुलांसाठी दीर्घकालनी बचत आणि आर्थिक नियोजनाला यामुळे हातभार लागणार आहे. भारतीय नागरीक असणे ही या योजनेची प्राथमिक अट असून नागरिकांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यातून आर्थिक सुरक्षा निर्माण केली जाते .